Saturday, May 16, 2020

सारपास

                                            स्वप्नांच्या पलीकडला प्रवास - सारपास

         
           मुंबई-दिल्ली -कुलू-भूँथर असा प्रवास करत चार मे च्या सकाळी आम्ही कसोल येथे सारपासच्या बेस कॅम्पला जाऊन पोहोचलो. हिरव्यागार वृक्षांनी वेढलेले छोटेसे मैदान, एका बाजूला खळखळ वाहणारी पार्वती नदी, दुसऱ्या बाजूला उंचावरून वळणा-वळणाने जाणारा डांबरी रस्ता व त्यापलीकडे देवदार वृक्षांचे घनदाट जंगल असे हे सुंदर ठिकाण होते. मागच्या बाजूला सूर्यकिरणांनी चमचमणारी हिमशिखरे साद घालीत होती. स्वागत कक्षाचा तंबू रंगीबेरंगी होता, तेथे नोंदणी झाली.


  गरमागरम चहा पिऊन मग जवळपास गोठायला आलेल्या त्या पाण्याने आंघोळ करण्याचे दु;साहस केल्यावर प्रवासाचा सगळा थकवा निघून गेला. जेवणानंतर कसोल गावात चक्कर मारायला बाहेर पडलो तेव्हा छान ऊन पडले होते. पार्वती नदी व हिमशिखरांच्या कुशीत वसलेले कसोल हे एक छोटेसे खेडे आहे. परंतु इंटरनेट सारख्या अत्याधुनिक सुविधा ही इथे पोहोचलेल्या आहेत. तिथे पर्यटनाच्या निमित्ताने आलेले व इतरही बरेच इस्रायली लोक दिसतात. काही दुकानांच्या पाट्याही इस्रायली भाषेत दिसल्या. हॉटेलच्या छोट्या-मोठ्या इमारती,बैठी घरे, लोकरीच्या कपड्यांनी नटलेली दुकाने, सायबर कॕफेज, राॕयल एनफिल्ड वरून फिरणारे देशी-विदेशी पर्यटक, मधूनच जाणारे शेळ्या-मेंढ्यांचे मोठाले कळप आणि प्रत्येक कुंपणावरून आपल्याला खुणावणारे रंगीबिरंगी टपोरे गुलाब असा हा सर्व माहोल होता.

        अतिशय उंचीवरील विरळ हवेची शरीराला सवय होण्यासाठी तीन दिवस बेस कॅम्पला राहावे लागते. येथे रात्री कॅम्पफायर मध्ये रोज एक-एक बॅच सांस्कृतिक कार्यक्रम सादर करते. मॉर्निंग एक्झरसाइज, अक्लायमेटायझेशन वाॕक, रॉक क्लायंबिंग, रॕपलिंग, परस्पर परिचय, पुढील तयारी इत्यादी गोष्टी या तीन दिवसात होतात. त्याशिवाय आम्हाला मनसोक्त हिंडायला मिळाले नदीकिनारी झाडीत व देवदार वृक्षांच्या जंगलात विविध आकारांचे, विविध रंगी पक्षी दिसले. रुबीथ्रोट, पॅराडाईज फ्लायकॅचर  ज्युवेनाइल, मॕगपी, रावेनस् इत्यादींची ओळखही पटली. त्याशिवाय अफूची झुडुपेही काही ठिकाणी दृष्टीस पडली.


कसोल गावात पुलावरुन पलीकडे गेले की गरम पाण्याचे झरे आहेत. मणिकर्ण हे पौराणिक महात्म्य असलेले स्थानही  येथून ४-५ किमी अंतरावर आहे. शंकर-पार्वती विहार करीत असताना पार्वतीच्या कर्णकुंडलातील मोती येथे पडला. तो शोधण्यासाठी वासुकी नागाला पाचारण करण्यात आले. मग वासुकी नागानी जी फुंकर मारली त्यातून प्रथम मणि बाहेर पडला व मग गरम पाण्याचे झरे वाहू लागले, अशी दंतकथा आहे; म्हणून नाव मणिकर्ण. एवढ्यात थंड हवेत येथील कुंडांमध्ये स्नान करणे म्हणजे निव्वळ चैन असते.

        आठ मे ला सकाळी सर्वांचा निरोप घेऊन आम्ही ग्रहण कॅम्पकडे जाण्यासाठी निघालो. ग्रहणची कॅम्प साईट चहूकडून डोंगरांनी वेढलेली होती. जवळच एक ओढा होता. त्याचेच पाणी नळीनी कँपपर्यंत आणलेले होते. ग्रहण कँपच्या जवळ गाव होते. ग्रहणमधील लाकडी घरे विशिष्ट पद्धतीची आहेत. इथे घरोघरी विणकामाचे हातमाग होते. चाँद युवा  नावाचे एक एनजीओ इथे काम करते. त्यांच्याकडून येथील लोकजीवन इत्यादीची माहिती मिळाली.

         वरच्या सर्व कॅम्पसमध्ये रोज संध्याकाळी सूप






 देण्यात येते. थंडगार हवेत निसर्गाच्या सान्निध्यात त्या
सूपची मजा ही वेगळीच असते. क्षणाक्षणाला निसर्ग त्याची रूपे पालटत असतो आणि तो एक एक क्षण जगताना, जपताना, साठवताना आपण आपल्याही नकळत त्याच्याशी एकरूप होऊन जातो.
        ग्रहण ते पद्री ही वाट निबिड अरण्यातून जाणारी होती. पाऊस पडून गेल्यामुळे आधीच उताराची असणारी वाट अधिक निसरडी झाली होती. वाटेत लाल-गुलाबी-केशरी रंगाचे मखमली फुलांचे गुच्छ लागलेली बरीच झुडुपे होती, त्यांचा मंद सुगंध, रानफुले आणि मधूनच दर्शन देणारी हिमशिखरे यामधून होणाऱ्या प्रवास म्हणजे 'राह बनी खुद मंझिल' असाच होता.

        झुळझुळ वाहणाऱ्या  झऱ्याच्या  एका बाजूला तंबू, त्यामागे अगदी जवळ दिसणारी हिमशिखरे तर दुसऱ्या बाजूला गर्द झाडी अशी होती पद्री कँपसाइट. इथल्या जंगलामध्ये अस्वले व वन्यप्राणी खूप आहेत. त्यामुळे एकेकट्याने लांब फिरायला जाणे धोक्याचे असते. इथे लेडी बग नावाचा एक चमकदार गडद लाल रंगावर काळ्या रंगाची नक्षी असलेला किडा दिसला. इथे सृष्टीसौंदर्याचा आस्वाद घ्यायला भरपूर अवकाश मिळाला. अशा शांत निवांत ठिकाणी घालवलेले, चित्तवृत्ती एकाग्र झाल्यावर जगाचा विसर पाडणारे काही क्षण म्हणजे आपल्या आयुष्यभराची पुंजी असते.

             पदरी ते रातापाणी हा सर्वात लांब ट्रेक होता. घनदाट जंगलातून तीव्र उतारावरून हजार फूट उतरल्यानंतर तीन हजार फूट चढाई होती. दुपारी दोनच्या जवळपास आम्ही लंच पॉइंटला पोहोचलो. त्या जागेवरून सभोवतालचा विस्तीर्ण भूप्रदेश दिसत होता. डावीकडे खोल दरी होती. समोर जवळ येत जाणारी हिमशिखरे व मागे घनदाट जंगल होते.पोहोचलो तेव्हा छान ऊन पडले होते. पण क्षणात आकाशाचे रंग पालटू लागले. पुढे बर्फातून चालायलाही गंमत येत होती. शेवटी एक छोटासा रॉक पॅच चढढून गेल्यावर रातापाणी कॅम्पच्या बॅनर जवळ आम्ही पोहोचलो. ती जागाही कुणीही चिकटवून बसावे अशीच होती. त्या टोकावर खाली खोल दरी होती वर पावसानंतर स्वच्छ झालेले निळे आकाश होते आणि दूरवर ग्रहण व पद्री कँप दिसत होते. करड्या रंगाचा उंच उडणारा ग्रिफन हा पक्षी दिसला.


             रातापाणी कॅम्पही भरगच्च झाडीने वेढलेला होता. पाण्याचा नळाच्या बाजूलाच शेकोटी होती. त्यामुळे त्या थंडगार पाण्यात हात घातला की लगेच शेक घ्यायचा. त्या शेकोटीजवळ कितीतरी वेळ गप्पांना रंगत आली होती. ग्रहणमधील कॅन्टीन वाले दोघेजण त्यात सामील झाले.त्यांची बोली भाषा कुलवी;  त्यांचे मुख्य व्यवसाय म्हणजे शेती व मेंढ्या पाळणे.  सूरदासांच्या दोह्यांनी या गप्पांची सांगता झाली.


         नगारूला जाताना पिवळी -जांभळी अशी छोटी-छोटी रानफुले लक्ष वेधून घेत होती. बर्फाचे टप्पे पार करून जाताना आकाशात उंच झेपावणारे गरुड व घारी दृष्टी खिळवून ठेवत होते. त्या उंचीवर पोहोचल्यावर तर 'आज मै उपर आसमाँ नीचे'असे सर्वांचे चेहरे प्रफुल्लीत झाले. नगारूचे तंबू बर्फात लागलेले होते. दृष्टि जाईल तिथे सगळीकडे हिमाच्छादित भूमी दिसत होती आणि आमच्या स्वागतासाठी आकाशातूनही हिमवर्षाव सुरू झाला. हिमवर्षावाचा आनंद लुटत असतानाच आकाश स्वच्छ होऊन लख्ख ऊन पडले. आता आकाशात सूर्य किरणांचा परतीचा प्रवास सुरू झाला होता. त्या आकाशाच्या कॅनव्हासवर पांढऱ्या शुभ्र  ढगांचे पुंजके व त्याखाली सरळ दोन रेषा ओढल्या सारखा पिवळ्या रंगाचा पट्टा, त्यामध्ये तांबूस लाल सूर्यबिंब आणि हे लोभसवाणे चित्र पाहायला हळूच डोकावणारा चांदोबा दिसत होता. मंत्रमुग्ध होऊन हा खेळ पाहत असताना कॅमेरा आणण्याचे भान येईपर्यंत चांदोबा ढगांशी लपाछपी खेळताना लपून बसला होता आणि सूर्य त्याची ०६:३६ ची लोकल पकडून निघून गेला होता. त्यावेळी मनात आले की आपण कधी अशा स्वर्गलोकी येऊ अशी स्वप्नातही कल्पना केली नव्हती.


             जेवण झाल्यावर आम्ही झोपण्याच्या तयारीत होतो. सर्वत्र दाट काळोख व्यापून राहिला होता. इतक्यात विद्युल्लतांचा लखलखाट सुरू झाला. घोंगावणारा वारा आणि वादळ यांचे तांडव सुरू झाले. डोळे गच्च मिटून आम्ही चौघी पडून होतो. आणि आपल्या  डोक्यावरचा हा तंबू आता उडून जाणार याची आम्हाला जवळ जवळ खात्री वाटत होती. अशातच माझा अर्धवट डोळा लागला असेल. मला जाग आली तेव्हा इतर तिघी जणी उठून तंबूच्या दोऱ्या ओढून बांधण्याचा प्रयत्न करत होत्या. म्हणजे अजून तंबू जागेवर होता तर!


          गरम चहा-नाश्ता घेऊन पहाटे चार वाजता टॉर्चच्या प्रकाशात एका लांबच-लांब रांगेतून आम्ही त्या बर्फातून चालू लागलो. तापमान शून्य डिग्री सेल्सिअसच्या आसपास होते. सारी सृष्टी पांढरी शुभ्र बर्फाची चादर पांघरुन गाढ झोपेत होती. आकाश निरभ्र होते. थोड्याच वेळात रविराजांचे आगमन झाले व चारी दिशा उजळल्या. सूर्योदयाच्या त्या अपूर्व उत्सवात तना-मनाने सहभागी होऊन आम्ही साधारण आठ वाजता सारपासला पोहोचलो. सारपासची उंची साधारण चौदा हजार फूट आहे. आत्तापर्यंत शांततेने मार्गक्रमण करणाऱ्या सर्वांच्या उत्साहाला एकदम उधाण आले. कोणी उड्या मारून, कोणी हर्षभराने जल्लोष करून, तर कोणी तिरंगा फडकवून हा आनंद साजरा केला. याचसाठी केला होता अट्टाहास.....



             
आता उतार सुरू झाला. बर्फामध्ये घसरगुंडी करुन जायला विलक्षण मजा येते. स्लायडिंग करताना बरोबर पोझिशन घेऊन जाता आलं तर ठीक आणि जर पोझिशन चुकली, पाय घसरला तर गडगडत जावे लागते; असे कौशल्यही काही जणांनी दाखवले. बर्फामध्ये चालण्याची, पडण्याची, खेळण्याची, घसरण्याची पुरेपूर मौज इथे अनुभवता आली.


            बिस्केरीला सूर्यास्ताच्या वेळेस सूप घेताना दूर पर्वतरांगांमध्ये कोसळणारा जलप्रपात दिसत होता. आणि अचानक त्यावर सूर्यकिरण पडून एक लांबलचक लोभसवाणे इंद्रधनुष्य दिसू लागले. बाह्यचक्षू आणि अंतःचक्षू  दोन्ही मंत्रमुग्ध होऊन गेले. बिस्केरी-पुलगा-बरसैनी हा ट्रेक तीव्र उताराचा आहे. वाटेत एका ठिकाणी हिरवंगार मैदान लागलं. त्यापलीकडे शिस्तीत उभे असलेले देवदार वृक्ष दिसत होते. या वाटेनी जाताना तरु-वेलींना, गिरीशिखरांना,धबधब्यांना आणि नदी-नाल्यांना अच्छा-टाटा म्हणताना मन जडावले होते.

              महाराष्ट्र , गुजराथ, दिल्ली, कर्नाटक आंध्रप्रदेश अशा वेगवेगळ्या प्रांतातून आलेले आम्ही सर्व जण इतके दिवस एकत्र प्रवास करत होतो. प्रत्येकाचे वय वेगवेगळे; विक्रम कॉलेजमध्ये इंजिनिअरिंगच्या दुसऱ्या वर्षाला होता तर नागपूरच्या नाना आगाशे साठ वर्षांचे होते. प्रत्येकाचे व्यवसायही वेगवेगळे; कोणी सरकारी अधिकारी, कोणी संशोधन क्षेत्रात, कोणी हॉस्पिटलमध्ये, कोणी बँकिंग/ फायनान्स मध्ये, कोणी सॉफ्टवेअर इंजिनिअर्स, कोणी पोलीस तर कोणी दागिन्यांचे व्यापारी. असे सर्व भिन्न प्रकृतीचे भिन्न भाषिक लोक आपली ओळख विसरून एकमेकांमध्ये कसे मिसळून गेलो ते कळलेही नाही. एकमेकांची थट्टा मस्करी करत आणि एकमेकांची काळजी घेत अकरा दिवस बघता-बघता भुरकन उडून गेले.


   बेस कँपला शेवटच्या रात्री कँप फायरमध्येआम्हाला सर्वांसमोर आपले मनोगत व्यक्त करण्याची संधी मिळाली. तेथे पुढे जाण्यासाठी तयार असलेल्या तीन बॅचेस होत्या. त्या सर्वांना वर परिस्थिती कशी आहे याबद्दल कमालीची उत्सुकता आणि बराचसा ताण वाटत होता. दुसऱ्या दिवशी सकाळी तुमचा अनुभव ऐकून व प्रफुल्लित चेहरे बघून आमचं टेन्शन गेलं, अशी पावती जेव्हा आम्हाला काही जणांकडून मिळाली तेव्हा खरंच समाधान वाटले. प्रसन्न  मनाने सर्वांचा निरोप घेऊन आम्ही कसोल कँप सोडला तो फिरून कधीतरी पुन्हा इथे येण्याचा निश्चय करुनच.....






































Sunday, May 3, 2020

सवाश्णी - वाघजाई - ठाणाळे ट्रेक, १५,१६ जून २०१७

सवाष्णी - तेलबैला - वाघजाई - ठाणाळे ट्रेक (१५,१६ जून २०१८)

             
               शनिवारी सकाळी पाऊस रंगात आला होता. मी आणि मधु ठाणे स्टेशनला भेटून जुईनगरसाठी गाडीत बसलो. "अभिजीत,आम्ही लोकल पकडली आहे तू निघालास का?" कुर्ल्याहून दीपक आणि अभिजीत एकत्र  येणार होते. आम्ही जुईनगरला आधी स्टेशनमध्येच थांबून राहिलो. एक चहा घेतला, मग पुलावरून रस्त्याकडे निघालो. तितक्यातच गाडीही आली आणि सुसाट निघाली. ते तिघे एकमेकांना ओळखतच होते. माझी जलतरणपटू आणि इतिहास विषय मुलांना गोष्टी सांगून रंगवून शिकविणाऱ्या  दीपक सरांशी ओळख झाली. मी घरातून देहाने जरी बाहेर पडले असले तरी चित्त अजून घरच्याच विचारात होते. सरांकडून हॉटस्पॉट घेऊन वाण्याची यादी पाठवली तेंव्हा कुठे मन घरातून बाहेर पडले. कल्पना आणि किशोरीची  फार आठवण येत होती. या दोन्ही माझ्या ट्रेकच्या  सख्या. वातावरण मस्त होते. लाल माती, हिरवीगार शेते, नुकतेच पडू लागलेले छोटे - छोटे धबधबे, सारे दृश्य विलोभनीय होते. जांभुळपाड्याला पोहे, मिसळ, उपमा, शिरा, बटाटेवडा आणि मऊ लुसलुशीत उकडीचे मोदक वर फक्कड चहा, खाण्याची चंगळ केली.
            
            आता धोंडसेच्या दिशेनी वेगानी निघालो. खोपोली - पाली रस्ता मस्त होता. हा रस्ता मला नेहमीच आवडतो. नदी, वळणे, शेते, देऊळ आठवणींमध्ये घेऊन जातात. धोंडसेवरून डोंगराच्या पायथ्याशी असलेल्या बहिरामपाड्याला पोहोचलो. सोबतीला वाटेनी सुधागड आणि सरसगड होते. बहिरामपड्यामध्ये मुलांना विचारले, चलता का वरती तेलबैलाला सवाष्णीनी, वर मुक्कम करुन उद्या रात्री वाघजाईनी उतरू या. मग गजानन बुवा आपली काठी आणि पाण्याची बाटली घेऊन, घरी जाऊन कारभारणीला उद्या परत येईन असे सांगून आम्हाला वाट दाखवायला निघाले. हा चढ तसा फार तीव्र नाही, उंचीही बेताची; हसत - खेळत - मजेत जाऊ. जेवणाची  घाई तर अजिबात नव्हती. तेलबैलाचे प्रथम दर्शन तर रस्त्यातूनच झाले होते. आपल्याला साधारणपणे कुठे जायचय याचा अंदाज यावा म्हणून 'U' आकाराच्या खिंडीच्या दिशेनी जायचे आहे असे गजानन बुवांनी सांगितले होते.  आमच्या स्वाऱ्या  उत्साहात निघाल्या. फळझाडे फळांनी लगडली होती. बाजूला घनगड उभा होता. मागच्या वेळी घनगडाला गेलो होतो तेंव्हा मिळालेल्या कैऱ्या आणि घनगडाच्या गुहेकडून दिसणारे भूदृश्य दोन्ही खास ... सरसगडाला जाताना उन्हामुळे चक्कर आली होती आणि सुधागडाची वाट दाट जंगलातून जाणारी, शीतल छाया देणारी आणि छोट्या - छोट्या शिड्यांनी चढवणारी; प्रत्येक वाटेचा पोत वेगळा. "मागच्या वेळी घाट - वाट कोणती केली होतीस?" "तुझ्या बरोबरच अस्वलखिंडीची" मग जादूचे गवत, दवानी भिजलेली पाती काही स्मरणचित्रे तरळून गेली. पुन्हा एकदा कल्पना हवी होती, कल्पनाला तिकडे उचक्या लागल्या असतील. दाट जंगल आणि हिरव्या पालवीची कोवळीक मन प्रसन्न करत होती. पाऊसवारा वाहत होता, पण पाऊस लपाछपी खेळत होता. पाऊस दिसला रे दिसला की त्याचा भोकंजा करण्याआधीच तो ढगात लपत होता.                                 

              वाटेत कुठे प्यायला पाणी नाही, पण बरोबर भरपूर पाणी होते. मग सुधागडाच्या समोर मोकळी जागा बघून आम्ही आमचे डबे काढले. आता सवाष्णी घाटाचे मोठे टप्पे पार केले होते आणि तेलबैला अगदी दृष्टिपथात आला होता. आजच तिकडेही जाऊ या, आमचा विचार झाला होता. तांदळाची भाकरी, आंबा मावा, खिचडी, लसूण चटणी, चेरी, केळी अशी पदार्थांची रेलचेल होती. त्या तिघांनी उकडलेली अंडीही चटणीबरोबर खाल्ली. दुपारचे अडीच-तीन वाजले होते आणि दूर बासरी साद घालत होती. रानात गुरे चरत होती. जवळच मुले खेळत होती. आणि आमचे ट्रेक आणि लंच पार्टनर जे आज बरोबर नव्हते , त्यांची उणीव जाणवत होती. जवळ जाऊ तसे तेलबैला आपले वेगळे रूप दाखवत होते. हे डोंगर इतक्या जवळून प्रथमच बघत होते.

डावीकडे नवरा-नवरी आणि वराडे होती.

बासरीवाल्याला भेटायचे राहून गेले.तेलबैला गाव आले. जेवणाची आणि राहण्याची सोय कुठे होईल का चौकशी करू लागलो. कारण इथे  फोन न लागल्यामुळे  कोणाशीच आधी संपर्क झाला नव्हता.  सगळी घरे मेंन्यांची आहेत. गजाननबुवांचे सोयरे भेटले. मास्तरांचे घर मोठे आहे. राहण्याची सगळी व्यवस्था होईल. घर छानच होते.  पण पिण्याचे पाणी हापशाचे;  पावसाळा असल्यामुळे पन्हाळी वरून पडणारे पाणी पिंपात साठवून ठेवल्याने  वापरायला भरपूर पाणी होते. सामान घरात ठेवून लगेच तेलबैला कडे निघालो. दुसऱ्या रस्त्यानी तेलबैलाच्या  पायथ्यापर्यंत गाडी


जाते. पिवळ्या रंगाची एक मिनी बस उभी होती. त्यामधून सकाळी घनगडाला जाऊन आलेली मंडळी भेटली. ते पुण्याकडे परत निघणार होते. त्यांच्याशी नमस्कार वगैरे करून  पुढे निघालो. झेंड्याची काठी लागली. तिथून खाली बघताना नजर ठरत नव्हती. फोटो झाला आणि मंदिराकडे निघालो. रोवलेला त्रिशूळ, शेंदूर फासलेले देव आणि एक पाण्याचे टाके असावे आतमध्ये. पण मंदिराला कुलूप होते. हे मंदिर दोन डोंगरांच्या सांध्यात बांधले आहे. इथे थोडी चिक्की खाऊन, भाकरी मात्र माकडांना दिली.  निवांत बसलो होतो. समोर तेलबैला प्रस्तरारोहणासाठी लावलेले बोल्ट दिसत होते. हे अवघड श्रेणीचे प्रस्तरारोहण नजरेनी करून घेतले. आम्ही दोन कड्यांच्या खिंडीत बसलो होतो. समोर खालच्या बाजूला मंदिर होते. आणि वर उंच कडे. माणसे घेऊन घाईघाईनी निघून जात होती. इथून तेलबैला गावात जायला जास्तीत जास्त अर्धा तास लागणार होता. आम्ही आरामात खाली उतरलो. भुरुभुरू पाऊस मधेच येत होता. घरी पोहोचून गरमागरम चहा, भेळ आणि गप्पागोष्टी अशी मस्त भट्टी जमून आली. इथे शाळा फक्त चौथीपर्यंत आहे. शिकायला आजींची एक नात आश्रमशाळेत राहत होती  तर दुसरीला शिकण्यासाठी दररोज दोन तीन तास एसटीने प्रवास




करावा लागतो. दोघी दहावीला.आई वडील पुण्याला. इथे आजी-आजोबांची शेतजमीन आहे. आजी फार प्रेमळ आणि अगत्यशील. वाढणं, जेवायला घालणं, सग्ळं मनापासून. अजून उजेड  होता. कारण वर्षातला सगळ्यात मोठा दिवस, २१ जून जवळ आला होता. फिरायला बाहेर पडलो. बाजूला डोंगर दिसत होते.

त्यामुळे घराच्या पडवीत चैन पडत नव्हते. मग शेतांमधून रस्ता काढत, डोंगराच्या शक्य तितक्या जवळ जरा बरी जागा बघून स्वस्थ बसलो. अभिजीतनी तर मस्तपैकी एक डुलकी काढली. दीपकनी हिंदी सिने गीते गायली. असे हिरव्यागार सृष्टीमध्ये डोंगरांच्या कुशीत निवांत मिळणारे क्षण तर ओढ लावतात, पुन्हा -पुन्हा ट्रेकला येण्याची. सूर्यास्ताचे काही चिन्ह नव्हते. पण पावसाचे ढग मात्र जमू लागले. म्हणून आम्ही परत फिरू लागलो. जाऊन शांत पडले. डोळे मिटत होते पण झोप लागली नाही. गप्पा मात्र मनसोक्त झाल्या. दीपक आणि अभिजीत गावात पुन्हा फेरफटका मारायला गेले. ते आल्यावर भरपेट जेवण आणि जेवणानंतर शतपावली.
         पहाटे साडेपाचला झोप उघडली. मुखमार्जन करुन चहाच्या आधीच  लाडू, सुकामेवा खाल्ला. मेन्यांबरोबर फोटो काढून, गजानन बुवांना सोबत घेऊन वाघजाईच्या रस्त्याला लागलो. उतार सुरु

होण्या आधी  सारा परिसर नजरेच्या कवेत घेणारी आणि सुधागडाची सोबत असणारी मस्त मोकळी जागा मिळाली. पुन्हा
एकदा आसमंतात पावा घुमत होता. आज मात्र येताना त्या बासरी वाल्याची आणि झाडांचा घोडा करणाऱ्या त्या मुलांची थोडी वाट वाकडी करून भेट घेतली. पराठे, मॅंगो


जाम, केक वगैरे भरपेट नाश्ता करुन  मग लगबगीने निघालो. आता परत निघाल्यावर बाजूला  दिसणारी ठाणाळे लेणी सोबत करत होती. देवीचे ठाणे आले. मला वाटतं देवी रक्षण करते घाटाचे म्हणून देवीचे  ठाणे. भगवा ध्वज  फडकत होता. तिथून पुढे निघाल्यावर दूरवर लेणी दिसली. आम्हाला खाली उतरून पुन्हा लेण्यांकडे जाण्याची वाट शोधत जायचे होते. म्हणून मग लेण्यांच्या उंचीवर आल्यानंतरही वाट शोधण्याचा प्रयत्न केला नाही. कारण वाघजाई घाट करणे हा आमच्या  ट्रेकचा प्राथमिक भाग होता. मग बरेच उतरून गेलो. ठाणाळे गावाकडे जाणारी वाट दिसली. पण वाघजाई घाटातून ठाणाळे लेण्यांकडे जाणारी वाट शोधायची होती. गजानन बुवा होते, तेही शोध घेऊ लागले. याच्या आधी वाट दाखवणारे बाण दिसत होते, पुन्हा ते बाण दिसतील का, याचा शोध घेऊ लागलो. दिशेचा अंदाज घेऊन साधारण मळलेल्या पायवाटेला लागलो आणि अचानक लेणी समोर आली. पावसाने मस्त जोर धरला होता.  सुरुवातीची काही लेणी प्राथमिक अवस्थेतील आहेत. पुढे एक प्रशस्त लेणे लागले. या लेण्यांमध्ये सुंदर कोरीवकाम आणि कातळात कोरून काढलेल्या सुबक पायऱ्या होत्या. कमळ कोरलेले होते. तसेच कमानींच्या सोंडेत कमळ घेतलेले दोन हत्ती, सर्प, वाघ वगैरे सुंदर कोरीव काम होते. यापुढील एका लेण्यात बरेच स्तूप होते. ही लेणी बघायला आमच्याशिवाय अजूनही काही मंडळी आली होती. पण पटापट बघून, सेल्फी काढून पुढे गेली. वाट वाकडी करुन ठाणाळे लेण्यांकडे येण्याचे सार्थक झाले होते. पावसाने भिजवून चिंब केले होते. बळीराम पाड्यातला राजाभाऊंच्या अस्थायी निवासस्थानी म्हणजे समाज मंदिर हॉलला आलो. इथे कोणीही येऊन राहू शकते. ट्रेकर किंवा यात्रेकरू एखादा मुक्काम करतात. मावशीनी गरमागरम गोड चहा दिला आणि भरपूर पापड तळले. पुरणपोळ्या, ठेपले, काकड्या जेवण सोबत होतेच. कपडे बदलून, जेवून परतीच्या प्रवासाला लागलो आणि पुन्हा जुईनगरला उत्तरलो. चिंब पावसाळी वातावरण भजी आणि गरम चहाची मागणी करत होते ते; ती घरी जाऊन पूर्ण केली.