Sunday, May 3, 2020

सवाश्णी - वाघजाई - ठाणाळे ट्रेक, १५,१६ जून २०१७

सवाष्णी - तेलबैला - वाघजाई - ठाणाळे ट्रेक (१५,१६ जून २०१८)

             
               शनिवारी सकाळी पाऊस रंगात आला होता. मी आणि मधु ठाणे स्टेशनला भेटून जुईनगरसाठी गाडीत बसलो. "अभिजीत,आम्ही लोकल पकडली आहे तू निघालास का?" कुर्ल्याहून दीपक आणि अभिजीत एकत्र  येणार होते. आम्ही जुईनगरला आधी स्टेशनमध्येच थांबून राहिलो. एक चहा घेतला, मग पुलावरून रस्त्याकडे निघालो. तितक्यातच गाडीही आली आणि सुसाट निघाली. ते तिघे एकमेकांना ओळखतच होते. माझी जलतरणपटू आणि इतिहास विषय मुलांना गोष्टी सांगून रंगवून शिकविणाऱ्या  दीपक सरांशी ओळख झाली. मी घरातून देहाने जरी बाहेर पडले असले तरी चित्त अजून घरच्याच विचारात होते. सरांकडून हॉटस्पॉट घेऊन वाण्याची यादी पाठवली तेंव्हा कुठे मन घरातून बाहेर पडले. कल्पना आणि किशोरीची  फार आठवण येत होती. या दोन्ही माझ्या ट्रेकच्या  सख्या. वातावरण मस्त होते. लाल माती, हिरवीगार शेते, नुकतेच पडू लागलेले छोटे - छोटे धबधबे, सारे दृश्य विलोभनीय होते. जांभुळपाड्याला पोहे, मिसळ, उपमा, शिरा, बटाटेवडा आणि मऊ लुसलुशीत उकडीचे मोदक वर फक्कड चहा, खाण्याची चंगळ केली.
            
            आता धोंडसेच्या दिशेनी वेगानी निघालो. खोपोली - पाली रस्ता मस्त होता. हा रस्ता मला नेहमीच आवडतो. नदी, वळणे, शेते, देऊळ आठवणींमध्ये घेऊन जातात. धोंडसेवरून डोंगराच्या पायथ्याशी असलेल्या बहिरामपाड्याला पोहोचलो. सोबतीला वाटेनी सुधागड आणि सरसगड होते. बहिरामपड्यामध्ये मुलांना विचारले, चलता का वरती तेलबैलाला सवाष्णीनी, वर मुक्कम करुन उद्या रात्री वाघजाईनी उतरू या. मग गजानन बुवा आपली काठी आणि पाण्याची बाटली घेऊन, घरी जाऊन कारभारणीला उद्या परत येईन असे सांगून आम्हाला वाट दाखवायला निघाले. हा चढ तसा फार तीव्र नाही, उंचीही बेताची; हसत - खेळत - मजेत जाऊ. जेवणाची  घाई तर अजिबात नव्हती. तेलबैलाचे प्रथम दर्शन तर रस्त्यातूनच झाले होते. आपल्याला साधारणपणे कुठे जायचय याचा अंदाज यावा म्हणून 'U' आकाराच्या खिंडीच्या दिशेनी जायचे आहे असे गजानन बुवांनी सांगितले होते.  आमच्या स्वाऱ्या  उत्साहात निघाल्या. फळझाडे फळांनी लगडली होती. बाजूला घनगड उभा होता. मागच्या वेळी घनगडाला गेलो होतो तेंव्हा मिळालेल्या कैऱ्या आणि घनगडाच्या गुहेकडून दिसणारे भूदृश्य दोन्ही खास ... सरसगडाला जाताना उन्हामुळे चक्कर आली होती आणि सुधागडाची वाट दाट जंगलातून जाणारी, शीतल छाया देणारी आणि छोट्या - छोट्या शिड्यांनी चढवणारी; प्रत्येक वाटेचा पोत वेगळा. "मागच्या वेळी घाट - वाट कोणती केली होतीस?" "तुझ्या बरोबरच अस्वलखिंडीची" मग जादूचे गवत, दवानी भिजलेली पाती काही स्मरणचित्रे तरळून गेली. पुन्हा एकदा कल्पना हवी होती, कल्पनाला तिकडे उचक्या लागल्या असतील. दाट जंगल आणि हिरव्या पालवीची कोवळीक मन प्रसन्न करत होती. पाऊसवारा वाहत होता, पण पाऊस लपाछपी खेळत होता. पाऊस दिसला रे दिसला की त्याचा भोकंजा करण्याआधीच तो ढगात लपत होता.                                 

              वाटेत कुठे प्यायला पाणी नाही, पण बरोबर भरपूर पाणी होते. मग सुधागडाच्या समोर मोकळी जागा बघून आम्ही आमचे डबे काढले. आता सवाष्णी घाटाचे मोठे टप्पे पार केले होते आणि तेलबैला अगदी दृष्टिपथात आला होता. आजच तिकडेही जाऊ या, आमचा विचार झाला होता. तांदळाची भाकरी, आंबा मावा, खिचडी, लसूण चटणी, चेरी, केळी अशी पदार्थांची रेलचेल होती. त्या तिघांनी उकडलेली अंडीही चटणीबरोबर खाल्ली. दुपारचे अडीच-तीन वाजले होते आणि दूर बासरी साद घालत होती. रानात गुरे चरत होती. जवळच मुले खेळत होती. आणि आमचे ट्रेक आणि लंच पार्टनर जे आज बरोबर नव्हते , त्यांची उणीव जाणवत होती. जवळ जाऊ तसे तेलबैला आपले वेगळे रूप दाखवत होते. हे डोंगर इतक्या जवळून प्रथमच बघत होते.

डावीकडे नवरा-नवरी आणि वराडे होती.

बासरीवाल्याला भेटायचे राहून गेले.तेलबैला गाव आले. जेवणाची आणि राहण्याची सोय कुठे होईल का चौकशी करू लागलो. कारण इथे  फोन न लागल्यामुळे  कोणाशीच आधी संपर्क झाला नव्हता.  सगळी घरे मेंन्यांची आहेत. गजाननबुवांचे सोयरे भेटले. मास्तरांचे घर मोठे आहे. राहण्याची सगळी व्यवस्था होईल. घर छानच होते.  पण पिण्याचे पाणी हापशाचे;  पावसाळा असल्यामुळे पन्हाळी वरून पडणारे पाणी पिंपात साठवून ठेवल्याने  वापरायला भरपूर पाणी होते. सामान घरात ठेवून लगेच तेलबैला कडे निघालो. दुसऱ्या रस्त्यानी तेलबैलाच्या  पायथ्यापर्यंत गाडी


जाते. पिवळ्या रंगाची एक मिनी बस उभी होती. त्यामधून सकाळी घनगडाला जाऊन आलेली मंडळी भेटली. ते पुण्याकडे परत निघणार होते. त्यांच्याशी नमस्कार वगैरे करून  पुढे निघालो. झेंड्याची काठी लागली. तिथून खाली बघताना नजर ठरत नव्हती. फोटो झाला आणि मंदिराकडे निघालो. रोवलेला त्रिशूळ, शेंदूर फासलेले देव आणि एक पाण्याचे टाके असावे आतमध्ये. पण मंदिराला कुलूप होते. हे मंदिर दोन डोंगरांच्या सांध्यात बांधले आहे. इथे थोडी चिक्की खाऊन, भाकरी मात्र माकडांना दिली.  निवांत बसलो होतो. समोर तेलबैला प्रस्तरारोहणासाठी लावलेले बोल्ट दिसत होते. हे अवघड श्रेणीचे प्रस्तरारोहण नजरेनी करून घेतले. आम्ही दोन कड्यांच्या खिंडीत बसलो होतो. समोर खालच्या बाजूला मंदिर होते. आणि वर उंच कडे. माणसे घेऊन घाईघाईनी निघून जात होती. इथून तेलबैला गावात जायला जास्तीत जास्त अर्धा तास लागणार होता. आम्ही आरामात खाली उतरलो. भुरुभुरू पाऊस मधेच येत होता. घरी पोहोचून गरमागरम चहा, भेळ आणि गप्पागोष्टी अशी मस्त भट्टी जमून आली. इथे शाळा फक्त चौथीपर्यंत आहे. शिकायला आजींची एक नात आश्रमशाळेत राहत होती  तर दुसरीला शिकण्यासाठी दररोज दोन तीन तास एसटीने प्रवास




करावा लागतो. दोघी दहावीला.आई वडील पुण्याला. इथे आजी-आजोबांची शेतजमीन आहे. आजी फार प्रेमळ आणि अगत्यशील. वाढणं, जेवायला घालणं, सग्ळं मनापासून. अजून उजेड  होता. कारण वर्षातला सगळ्यात मोठा दिवस, २१ जून जवळ आला होता. फिरायला बाहेर पडलो. बाजूला डोंगर दिसत होते.

त्यामुळे घराच्या पडवीत चैन पडत नव्हते. मग शेतांमधून रस्ता काढत, डोंगराच्या शक्य तितक्या जवळ जरा बरी जागा बघून स्वस्थ बसलो. अभिजीतनी तर मस्तपैकी एक डुलकी काढली. दीपकनी हिंदी सिने गीते गायली. असे हिरव्यागार सृष्टीमध्ये डोंगरांच्या कुशीत निवांत मिळणारे क्षण तर ओढ लावतात, पुन्हा -पुन्हा ट्रेकला येण्याची. सूर्यास्ताचे काही चिन्ह नव्हते. पण पावसाचे ढग मात्र जमू लागले. म्हणून आम्ही परत फिरू लागलो. जाऊन शांत पडले. डोळे मिटत होते पण झोप लागली नाही. गप्पा मात्र मनसोक्त झाल्या. दीपक आणि अभिजीत गावात पुन्हा फेरफटका मारायला गेले. ते आल्यावर भरपेट जेवण आणि जेवणानंतर शतपावली.
         पहाटे साडेपाचला झोप उघडली. मुखमार्जन करुन चहाच्या आधीच  लाडू, सुकामेवा खाल्ला. मेन्यांबरोबर फोटो काढून, गजानन बुवांना सोबत घेऊन वाघजाईच्या रस्त्याला लागलो. उतार सुरु

होण्या आधी  सारा परिसर नजरेच्या कवेत घेणारी आणि सुधागडाची सोबत असणारी मस्त मोकळी जागा मिळाली. पुन्हा
एकदा आसमंतात पावा घुमत होता. आज मात्र येताना त्या बासरी वाल्याची आणि झाडांचा घोडा करणाऱ्या त्या मुलांची थोडी वाट वाकडी करून भेट घेतली. पराठे, मॅंगो


जाम, केक वगैरे भरपेट नाश्ता करुन  मग लगबगीने निघालो. आता परत निघाल्यावर बाजूला  दिसणारी ठाणाळे लेणी सोबत करत होती. देवीचे ठाणे आले. मला वाटतं देवी रक्षण करते घाटाचे म्हणून देवीचे  ठाणे. भगवा ध्वज  फडकत होता. तिथून पुढे निघाल्यावर दूरवर लेणी दिसली. आम्हाला खाली उतरून पुन्हा लेण्यांकडे जाण्याची वाट शोधत जायचे होते. म्हणून मग लेण्यांच्या उंचीवर आल्यानंतरही वाट शोधण्याचा प्रयत्न केला नाही. कारण वाघजाई घाट करणे हा आमच्या  ट्रेकचा प्राथमिक भाग होता. मग बरेच उतरून गेलो. ठाणाळे गावाकडे जाणारी वाट दिसली. पण वाघजाई घाटातून ठाणाळे लेण्यांकडे जाणारी वाट शोधायची होती. गजानन बुवा होते, तेही शोध घेऊ लागले. याच्या आधी वाट दाखवणारे बाण दिसत होते, पुन्हा ते बाण दिसतील का, याचा शोध घेऊ लागलो. दिशेचा अंदाज घेऊन साधारण मळलेल्या पायवाटेला लागलो आणि अचानक लेणी समोर आली. पावसाने मस्त जोर धरला होता.  सुरुवातीची काही लेणी प्राथमिक अवस्थेतील आहेत. पुढे एक प्रशस्त लेणे लागले. या लेण्यांमध्ये सुंदर कोरीवकाम आणि कातळात कोरून काढलेल्या सुबक पायऱ्या होत्या. कमळ कोरलेले होते. तसेच कमानींच्या सोंडेत कमळ घेतलेले दोन हत्ती, सर्प, वाघ वगैरे सुंदर कोरीव काम होते. यापुढील एका लेण्यात बरेच स्तूप होते. ही लेणी बघायला आमच्याशिवाय अजूनही काही मंडळी आली होती. पण पटापट बघून, सेल्फी काढून पुढे गेली. वाट वाकडी करुन ठाणाळे लेण्यांकडे येण्याचे सार्थक झाले होते. पावसाने भिजवून चिंब केले होते. बळीराम पाड्यातला राजाभाऊंच्या अस्थायी निवासस्थानी म्हणजे समाज मंदिर हॉलला आलो. इथे कोणीही येऊन राहू शकते. ट्रेकर किंवा यात्रेकरू एखादा मुक्काम करतात. मावशीनी गरमागरम गोड चहा दिला आणि भरपूर पापड तळले. पुरणपोळ्या, ठेपले, काकड्या जेवण सोबत होतेच. कपडे बदलून, जेवून परतीच्या प्रवासाला लागलो आणि पुन्हा जुईनगरला उत्तरलो. चिंब पावसाळी वातावरण भजी आणि गरम चहाची मागणी करत होते ते; ती घरी जाऊन पूर्ण केली.





 
       


































4 comments:

  1. छान लेख. Missing trekking days

    ReplyDelete
  2. नमिता,
    अतिशय अप्रतिम ट्रेकिंग लेख आहे. सवाष्णी - तेलबैला - वाघजाई - ठाणाळे ट्रेकचे समग्र वर्णन केले आहेस. बारीक बारीक घटनांचे अतिशय समर्पक रसग्रहण केले आहेस. तुझा लेख म्हणजे निसर्गचित्र आहे.

    निसर्गावर प्रेम करणारी आणि ट्रेकिंगचे पॅशन असणारी माणसेच मिळालेला आनंद सर्वांना वाटतात, याची प्रचिती आली.

    अभिजित गुंजाळ आणि दीपक निचित दोघेही माझे मुंबई कन्याकुमारी सायकलींगचे सहकारी होते. या ट्रेकला ते तुझ्या बरोबर होते हे वाचून मन आनंदाने प्रफुल्लित झाले. एकाच वेळेला EBC आणि मुंबई कन्याकुमारी सायकलिंग दुनियेत घेऊन गेले ; मन.

    नमिता, तुझा लेख म्हणजे निसर्गाचे ट्रेकिंगचे शब्द चित्र आहे.

    असेच लिहित रहा !!!

    आनंद वाटत रहा !!!

    सतीश जाधव

    ReplyDelete
  3. very good indeed. when will this resume namita?

    ReplyDelete
  4. सुंदर वर्णन.प्रत्यक्ष गेल्याचा अनुभव आला.सह्याद्रीशी जवळिक एकदा झाली की संधी मिळेल तेव्हा पाय आपोआप तिकडे वळतातच

    ReplyDelete